अकबर बिरबलच्या गोष्टी बहुतेक कपोलकल्पित असल्या तरी त्यातील अनेकांचे प्रत्यंतर आजही येत असते (आणि त्यामुळेच त्यांचे आकर्षण अजूनही टिकून आहे).
त्यापैकी एक म्हणजे “जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती!” .
जिज्ञासूंनी मूळ गोष्ट वाचावी पण थोडक्यात सांगायचं म्हणजे – एका चुकीच्या वाक्याने घालवलेली पत त्यानंतर कितीही सारवासारव केल्याने परत येत नाही.
याचे प्रत्यंतर गेल्या काही दिवसांतच वारंवार आले आहे.
अच्युत गोडबोले यांनी अनेक विषयांवर विपुल लेखन केले आहे, करत आहेत . त्यांच्याबद्दल विकिपीडिया लेखक (म्हणजे विकिपीडियावरील लेखांचे निव्वळ मराठी संस्करण करून पुस्तक लिहितात), वगैरे अनेक प्रवाद असले तरी मराठीला ज्ञानभाषा बनवण्यात ते एक अमूल्य योगदान देत असल्याने मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. पण काही दिवसांपूर्वी त्यांची गाझा पट्टीबद्दल गळा काढणारी पोस्ट वाचली. एरवी काही आक्षेप नसता, पण (माझ्यासकट) अनेकांना चीड यायचं कारण म्हणजे या महोदयांनी पहलगाम , बांगलादेश येथील नृशंस हत्याकांडाबद्दल चकार शब्द काढलेला (निदान मला तरी) दिसला नाही. त्यामुळे अशा अनाठायी उमाळ्यांबद्दल त्यांच्या पोस्टवर बहुतेकांनी त्यांना सुनावले.
ए आर रेहमान हा आवडत्या संगीतकारापैकी एक; 'गुरु' पर्यंतच्या सर्व चित्रपटांतील त्याची गाणी आवडली होती . तो अतिशय प्रतिभावान संगीतकार आहे, यात दुमत नाहीच . अशा व्यक्तीने, काहीही गरज नसताना, विक्टिम कार्ड खेळल्याने सर्व थरांतील लोकांनी त्याला फटकारले. त्याने त्यावर 'मला तसे काही म्हणायचे नव्हते' वगैरे मखलाशी केली असली तरी… बुंद से गयी ती गयीच .
सहज केलेल्या एखाद्या वक्तव्याचे परिणाम किती दूरगामी होऊ शकतात हे नरेंद्र मोदी यांना 'चायवाला', 'मौत का सौदागर' वगैरे संबोधणाऱ्या काँग्रेसला विचारा!
अगदी ताजे उदाहरण म्हणजे 'लातूर शहरातून विलासराव देशमुखांचे नाव पुसून टाकू' या एका गैरवाजवी वक्तव्यानंतर अनेकवार स्पष्टीकरण देऊनही भाजपाला ती महापालिका गमवावी लागल्याचे बोलले जात आहे .
आणि तरीही – वरील सर्व उदाहरणांत उधळली गेलेली मुक्ताफळे ही त्या-त्या व्यक्तींनी जाणूनबुजून तरी केली होती . पण आजकाल मीडिया टीआरपी मिळवण्यासाठी एवढा मोकाट सुटला आहे की अनेकदा साध्यासुध्या, निरुपद्रवी वाक्यांनाही भलतेच वळण देऊन त्या व्यक्तीला बदनाम केले जाते .
त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकाने, आपल्या विधानाचा विपर्यास केला जाऊ शकतो हे लक्षात ठेवूनच तोंड उघडले पाहीजे .
गौतम सोमण
१९ जानेवारी २०२६
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जानेवारी२०२६