
“गारवा वाऱ्यावर भिरभिर पारवा नवा नवा
प्रिये, नभातही चांदवा नवा नवा..”
मस्त पावसाळा सुरु आहे. नुकताच दमदार पाऊस पडून चौफेर बाजूनीं निसर्गाची उधळण करतोय. जणू हिरव्या कंच रंगाच्या पाचुंचा शेला पांघरलाय, हवेत मस्त धुंद गारवा पसरला आहे सोबत बिनधास्त मैत्रिणींची गँग भटकंतीला निघालीये… मग काय….
“गारवा गारवा भिर भिर.. पारवा” हे गाणं ओठी नाही असं शक्यच नाही.
प्रत्येक क्षण आनंदाचा, निसर्गासोबत भरभरून जगावंसं वाटतंय… शहरातल्या त्या सिमेंटच्या जगाबाहेर मोकळा श्वास, हिरवाई मनात साठवावी असंच काहीस होतं, अगदी प्रत्येक पावसाळ्यात.
तो मनसोक्त बरसलाय..आजूबाजूची ती काळी धरती ओलिचिंब झालीये.. कितीतरी दिवसांनी जणू एकमेकांना भेटतायेत. त्यांच्या या मिलनाचा सुगंध आसमंतात पसरलाय. पाऊसपक्षी चिंब भिजलाय. हळूच पंख फडफडून तो त्याचा आनंद व्यक्त करतोय.जणू शांताताई म्हणतात त्याप्रमाणे..
“गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा” ।
या पावसाची किमयाच वेगळी,प्रत्येक झाडं बहरलय, सोबत रानफूलं डौलाने डोलतायेत जणू आपल्याच कडे बघून हसतायेत. रस्ते अगदी स्वच्छ झालीयेत आणि त्यात वरतून गाडीतून बाहेर डोकं काढून पाहिलं तर तो वळणावळाणाचा रस्ता त्याच्या दोन्ही बाजूला असलेली ती बहरलेली वृक्ष जणू एकामेकांशी गुंजगोष्टी करत आपल्या स्वागतासाठी सुंदर अशी स्वागताची कमान करतायेत…
अशा वेळी सहज आठवतात कवियित्री शांता शेळके यांच्या कवितेच्या या ओळी..
“ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा ।। ऋतु हिरवा ।।”
म्हणता म्हणता अचानक काळे नभ गगनी दाटून येतात आणि अचानक धारा कोसळू लागतात.. या धारांसोबत मन पण चिंब होतं.
हळूच कुठे तरी मोराचा केकारव ऐकू येतं..
आणि आठवतात..
“घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥”
त्यातच कुठे उगाचच मनाला वाटतं तो कृष्णमुरारी कालिंदीच्या काठी बासरी वाजवीत उतरला की काय… सहज ओठी येतं..
“कालिंदीच्या तटी श्रीहरी, तशात घुमावी बासरी.. “
कोसळणाऱ्या धरांनी मन स्वच्छ होतं. झाडें, नाले चक्क रस्तेही स्वच्छ होतात… आजूबाजूचे आहोळ व्हायला लागतात, मंजुळ गीत ऐकायला येतं…
त्यात गावातला रस्ता त्यामुळे वरदळ कमीच. कोणी एखादा शेतकरी बैलांना घेऊन शेतात कामाला निघालाय.. तर एखादी स्त्री शेतावर जाण्याच्या गडबडीत दिसतेय..जणू तीला बाकीच्या जगाचं भानच नाही.. तीचं वावर तिची वाट बघतंय…! कुठेतरी लहानशी पोरं छत्री, दप्तर सांभाळत शाळेला निघालीयेत.. स्वतः सोबत दप्तरं ओल होऊ नाही म्हणून सांभाळत… चालीयेत..
अहो खाली धरती वर पाय ठेवताच… अंग शहारुन येतं.. ती थंडी हवा मनालाही सुखावून जाते. मन त्या हिरव्या रंगांच्या छटावर विहरायला लागतं..किती त्या छटा कुठे गडद हिरवा रंग, कुठे फिकट पोपटी रंग, कुठे पिवळासार झाक असलेली हलकी हिरवी झालर… तर बाजूला बघावं तर बाजूच्या भात शेती मधून गाणी ऐकायला येतात… जवळ जाऊन पाहावं तर शेतामध्ये गुडघ्याभर पाण्यात इरलं पांघरून उभ राहून स्त्रिया भात लावणी करत असतात… आणि हो सोबत परंपारीक भलरी गीत ऐकू येतं…
“घे भलरी घे, भलरी घे ,भलरी घे
घे भलरी घे, भलरी घे ,भलरी घे
घे गड्या घे भलरी घे
आर घे गड्या घे भलरी घे
म्हणू का नको म्हण म्हण गड्या
आर म्हणू का नको म्हण म्हण गड्या –
भलरी दादा,भलरी दादा,
म्हाताऱ्या राजाची म्हातारी राणी
काळया आईला मोटचं पाणी
मोटच्या पाण्याव चांदाच रूप
चांदाच्या रूपाव कशाची कळी, कशाची कळी, कशाची कळी
म्हाताऱ्या राणीच्या गालाची खळी –
म्हणू का नको म्हण म्हण गड्या –
भलरी दादा, हा ssss
खरंच किती सहज या गाण्यातून त्या व्यक्त होतात….! रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी एकमेकींना सांगत सहज या गाण्यातून मन मोकळ करतात..या गाण्यात इतक्या रंगून जातात की आपली भात लावणी पूर्ण होतं आलीये हे हि लक्षात येतं नाही..दिवसभर पाण्यात उभ राहून आलेला थकवा सहज या गाण्यात तल्लीन झाल्यामुळे विसरून जातात… त्या भात लावीणीचा पोपटी हिरवा रंग सहज त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावतो…
पावसाळा हा असाच, कवि सौमित्र यांच्या कवितेत म्हणतात..तसा..
“ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात..
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते माझ्या मनात…”
दिपाली लाभे





