महिला दिनानिमित्त …
स्त्री स्वातंत्र्य एक आढावा
स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ –स्वत:चे तंत्र किंवा नियम स्वतः चालवणे.
थोडक्यात स्वतःच्या आत्म्याला किंवा बुद्धीला पटेल असे वागण्याचे किंवा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य.
स्त्री स्वातंत्र्य –स्त्री +स्वातंत्र्य
अर्थ –रूढी परंपरांच्या बंधनातून मुक्त होऊन निर्णय घेण्याची क्षमता, आत्मसन्मान आणि सुरक्षितता.याचे मुख्यतः तीन घटक आहेत .
* आर्थिक स्वातंत्र्य –स्वत:च्या पैशांवर अधिकार
आणि निर्णयक्षमता असणं.
* सामाजिक स्वातंत्र्य –शिक्षण, स्वप्रगती आणि स्वतःच्या लग्नाविषयी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य.
* भावनिक स्वातंत्र्य –स्वत:च्या भावना व्यक्त करण्याचे आणि व्यक्तिमत्व घडविण्याचे स्वातंत्र्य.
जिने वाहिले नऊ मास ओझे. जिने चिंतीले कल्याण माझे
जिला मोद होई पाहूनी मजला
नमस्कार माझा त्या माऊलीला
जिच्यापासून एक ' विश्व 'तयार झाले अशी ही स्त्री अनंत काळाची माता आहे.दैत्यांचा संहार करणारी देवता तिचा आपण सन्मान करतो.माणूस म्हणून स्त्री-पुरुष दोन्ही ही सारखेच महत्वाचे आहेत.पण हा फक्त आभास आहे की आव्हान हे मात्र विचारणीय आहे.
प्राचीन काळ–अश्मयुगात पुरुषाने स्त्रीला
शिकारी पासून वंचित ठेवून गृहिणीचा दर्जा देऊन तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतले.
सिंधू संस्कृती–स्त्रीला ' मातृदेवता ' म्हणून
गौरविले.परंतु पुरुषप्रधान संस्कृतीच राहिली.
प्राचीन वैदिक काळ–स्त्रियांवर उपनयन संस्कार होत असत.शिक्षणाची संधी होती.त्यामुळेच
' गार्गी ', ' लोपामुद्रा 'यांचे ग्रंथ उल्लेखनीय आहेत.त्याकाळी स्त्री यज्ञ करत होती.नृत्य, गायन,कला क्षेत्रात पण पुढे होती .परंतु मालमत्तेवर तिचा अधिकार नव्हता.
मध्ययुगीन काळ –सामाजिक परिवर्तन होऊन स्त्रियांचे उपनयन संस्कार बंद झाले.गुरूगृही जाण्यापासून तिला वंचित केले.मुस्लिम आक्रमणाच्या काळात तिला एक चैनीची वस्तू मानले गेले.तसं पहायला गेलं तर अगदी स्त्री संतांनी पण आपल्या स्वातंत्र्यासाठी समाजाच्या विरोधात पावलं उचलली होती.उदा.अध्यात्मिक क्षेत्रातील मुक्ताबाईंचा तेजस्वी वावर, वर्षानुवर्षे कोंडून ठेवलेला आक्रोश प्रकट करणारी नामदेव शिष्या जनाबाई, प्रापंचिक आयुष्यातील अनुभव सहन करूनही तुकारामांच्या भक्तिविश्वाशी एकरुप झालेल्या संत बहिणाबाई, किंवा घरादाराचा त्याग करून रामदास स्वामींचे शिष्यत्व पत्करून मठाधिपती पदाची धुरा सांभाळणा-या संत वेणाबाई म्हणजे स्रीमनाचे
स्वयंभू हुंकाराचे उन्मेष आहेत.एक प्रकारे अध्यात्मिक चळवळीच्या माध्यमातून स्त्री मनाचा मागोवा हा स्त्री स्वातंत्र्याच्या आणि स्त्री मुक्तीच्या एक महत्त्वाचा टप्पा आहे . परंतु आपण हे पण लक्षात घेतले पाहिजे तिच्या या चळवळीत पुरूष संतांनी तसेच समाजसुधारक लोकांनी पण तिला सहयोग दिला आहे.अगदी जिजाबाईंचे उदाहरण घेतले तर त्या देखील स्वतंत्र विचारांच्या होत्या.मल्हारराव होळकरांनी पण अहिल्याबाईंना साथ दिली नसती तर त्या काहीच करू शकल्या नसत्या.त्याकाळात त्यांनी पण स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी कष्ट घेतले.झाशीची राणी सारखी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी बंड पुकारले.नंतरच्या काळात स्त्रियांना बालविवाह,हुंडा प्रथा,केशवपन यांसारख्या गोष्टींना तिला सामोरे जावे लागले. त्यामुळे तिचे व्यक्तीमत्वच खुंटले.
इंग्रजांच्या काळात –आपण सर्वच गुलाम झालो.पण त्याच काळात पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार झाला . स्वातंत्र्य,समता, बंधुता यांची बीजे रोवली गेली.त्यातूनच महर्षी कर्वे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजाराम मोहन रॉय सारखे समाजसुधारक तयार झाले ज्यांनी स्त्रियांचे प्रश्न हाताळले आणि अनिष्ट रूढी बंद केल्या.पंडिता रमाबाईंनी स्त्रियांना राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश मिळवून दिला.स्वातंत्र्याच्या चळवळीत स्त्रियांनी पण आपले योगदान दिले.
आणि मग ' जिच्या हाती पाळण्याची दोरी
ती जगाशी उद्धारी 'असेही म्हटले गेले.
सुरुवात १९ व्या आणि २०व्या शतकात– समाजसुधारकांनी आणि स्त्रियांनी शांततेच्या मार्गाने , वैचारिक पातळीवर स्त्रीमुक्ती चळवळ सुरू केली.वसाहतवाद ,साम्यवाद आणि त्यानंतरच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात स्त्री वादाचा तिसरा टप्पा सुरू झाला,जिथे वैयक्तिक स्वातंत्र्याला जास्त महत्त्व आले.आणि १९७५च्या आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती वर्षानंतर या चळवळीने जोर पकडला ज्यामुळे आजची स्त्री
अधिक सक्षम आणि आत्मविश्वासी झाली आहे.
आजच्या संदर्भात स्त्री स्वातंत्र्याचे स्वरुप–
आत्मनिर्भरता –स्वत:चे प्रश्न सोडविण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे
निर्णय क्षमता –स्वत:च्या बाबतीतील सर्व निर्णय आणि जगण्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार
कायदेशीर सुरक्षा –भारतीय कायद्यांनी दिलेले
समानता आणि संरक्षणाचे अधिकार.
स्त्री स्वातंत्र्य ही केवळ संकल्पना नसून ती प्रगतीशील समाजाची निदर्शक आहे,जिथे स्त्रीला पुरुषाइतकाच सन्मान आणि संधी मिळते. स्त्रीशक्तीचा विचार आचार्य विनोबा भावे यांनी मांडला तर आचार्य दादा धर्माधिकारी यांनी स्त्री मुक्तीचा विचार उचलून धरला.
प्रमिला दंडवते,मृणाल गोरे ,अहिल्या रांगणेकर यांनी स्त्री मुक्तीसाठी जोमाने लढा देऊनही आजची स्री पूर्ण पुणे मुक्त नाही याची खंत वाटते.आजच्या संगणकाच्या युगात आपण जागतिक दृष्टिकोनातून सखोलपणे विचार केला तर स्त्री स्वातंत्र्य हे एक आव्हान आहे असं मानून त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.आणि स्त्री स्वातंत्र्य किंवा मुक्ती आभास न राहता प्रत्यक्षात जेव्हा उतरेल तो दिवस जगाच्या पाठीवर खरोखरच ' सुवर्ण दिन '
ठरेल महिला दिन ठरेल.