लेखन सोहळ्याची “सांगता!!”
.. हेमंत नाईक
३०. ०१. २०२५
संगीत क्षेत्रात ‘राग भैरवी’ हा सकाळचा अत्यंत लोकप्रिय, शांत आणि भावपूर्ण राग म्हणून ओळखला जातो, जो सहसा गाण्याच्या मैफिलीचा गोड शेवट (समापन) करण्यासाठी गायला जातो.
“भैरवी” हे हिंदू धर्मातील देवी पार्वतीच्या दहा महाविद्यांपैकी एक प्रचंड रूप, कुंडलिनी शक्तीची देवता आणि भगवान भैरवाची पत्नी मानली जाते. ती सर्वोच्च योगिनी, असुरासाठी विध्वंसक शक्ती आणि भक्तांसाठी शुभंकारी, कल्याणकारी माता आहे.
गायनाच्या कार्यक्रमाच्या शेवटी “भैरवी” गातात. आज आपण सातत्याने “३० दिवसात ३०” या सुरेख लेखनप्रयोगाची सांगता “सांगता” हाच विषय घेऊन करतो.
सुरपाखरूच्या मंचावर “३० दिवसात ३०.. प्रयोग २०२६” या लेखन सोहळ्यात प्रत्येकाची लिहिण्याची शैली बघून मला खूप शिकायला मिळाले. कथा, ललित, पर्यटन, ऐतेहासिक, स्फूट, बोधप्रध लिखाण मनोरंजना बरोबर मनात अनेक प्रश्न देखील विचारत होते. लेख कविता, पत्र, कथा, माहिती, असे अनेक रूपात लेखन झाले.अगदी अडीच पानात डायरीवर लिहीलेले पण प्रत्येक ओळ अर्थपूर्ण असलेले मोत्याचे अक्षर म्हणजे काय? हे सांगणारे, आणि सर्वांचेच विविधरंगी भावपूर्ण माहिती देणारे लिखाण खूप सुंदर व वाचनीय होते. यात्रेत सहभागी झालेल्या सर्व लेखक लेखिकांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
खरं सांगू तर प्रत्येक लेख हा संगीतातल्या वेगवेगळ्या रागाप्रमाणे भावनांची,नवरसांची अनुभूती देत होता. तीस दिवसाच्या या सातत्य राखून केलेल्या लिहिण्याच्या रियाझाने आपले लेखन कौशल्य नक्कीच उंचावले असणार.
१५ ऑगस्ट ८८ ला आपल्या देशाच्या विविधतून एकता ही कल्पना घेऊन जवळपास चौदा भाषेतून गायिलेले आपल्या संस्कृतीची ओळख कारून देणारे,
“मिले सुर मेरा तुम्हारा..
तो सुर बनेगा हमारा..”
हे भैरवी या रागात गायिलेले गीत एकतेचे एकत्रित काम करण्याचे महत्व सांगते.
तसंच काहीस एकत्रित लिहिण्याने मला वाटल. एकामेकांच्या लिहिण्याची शैली अनुभवून ही लेखन यात्रा अविस्मरणीय ठरली आहे.
“तुमचा स्वभाव..तुमचे विचार लेखनात दिसून येतात.” असे म्हणतात. एकमेकांच्या लेखन सहवासाने ते वाचनाने ओळख नसतानाही नकळत लिहिण्याने ओळख कळली.
” लिहण येण्यासाठी प्रथम वाचन चांगले पाहिजे!” हे अर्धसत्य आहे.. माझ्या मते एखादा स्पार्क अर्थात कथाबीज, अनुभवाची शिदोरी, चांगले वाचन आणि चिंतन आदी सर्व जवळ असले तरी शारदेचे विशेष वरदान असल्याशिवाय उत्तम लिखाण शक्य नाही.”
अगदी कमी शिकलेल्या बहिणाबाईच्या कविता जात्यावर दळता दळता पोटातून ओठी येत होत्या. अत्यंत साध्या सोप्या मोजक्या शब्दात कवितेतून लिहिलेल्या तत्वज्ञानावर, अजूनही विदयार्थी त्यांच्या कवितेचा विषय घेऊन शोधप्रबंध लिहिता आहेत.
एकेक जोडूनी शब्द सारे
लिहितो ओळी मागे ओळी
नवरसं त्यात भाव भावनांचे
सांगण्या मदतीला बाराखडी!!
तीस दिवस साततत्याने
लिहिले मनातले सर्वकाही
कुणी तरुण वा कुणी जेष्ठ हो
लिहिणे न्यारे होते भारी!!
ऍडमिन, लेखक कवि ते
अनेक गुण त्यांचे अंगी
अबोल त्याच्या चित्रातूनी
तुषार आनंदाचे उडवून जाई!!
आपल्या मायबोली मराठीला संत, लेखक, कवि, विचारवंत, कलावंत यांचा थोर वारसा मिळाला आहे.त्या सर्वांनी तिला समृद्ध केले आहे. त्याची नाव लिहिण्यास घेतले तर वह्यांची पाने अपुरे पडतील, त्या सर्व मानकऱ्यांना मी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो.
आपल्या या मराठीच्या मायबोलीच्या पालखीचे अनेक भोई असले तरी या मराठीच्या पालखीच्या मिरवणुकीत अगदी सर्वात शेवटी चालणारा मी पण एक माय मराठीचा निस्सीम भक्त आहे.
सातत्याने लिहिण्यासाठी
तीस दिवसाची केली यात्रा..
शेवटचा आज दिवस हा
गोड करूया तिची “सांगता ” !!
मनोरंजन, ज्ञानवर्धन जाहले
चहा सोबत लेख रोज वाचता..
एकापेक्षा ते एक सरस ते
काय सांगता! काय सांगता!
सेशनस सुंदर सर्व झाले रे
अचूक दिशा देई ऍडमिन सर हो
लेखनावर रंगे चर्चा तिथे
काय सांगता! काय सांगता!
लिहिण्यास विषय असंख्य ते
खजिना अनुभवाचा खूप रे
प्रत्येक आयुष्य एक सुरस कथा
काय सांगता! काय सांगता!
निघून जाऊ आम्ही कधी
जीर्ण होईल ही पण वही
इतिहास ती नक्की सांगेल हो
काय सांगता! काय सांगता!
लिहिण्याच व्रत असेच अविरत सुरु ठेवण्याच्या शुभेच्छा देऊन प्रयोग २०२६ मधील आजच्या शेवटच्या तिसाव्या लेखास विराम देतो.. उद्या पुन्हा काहीतरी लिहिण्यासाठी!!
😄😄😄😄
🙏🙏🙏🙏
.. हेमंत नाईक
३०. ०१. २०२६
#सुरपाखरू#३०दिवसात ३०#प्रयोग२०२६