आज वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मृतीदिनानिमित्त
कलंदर (रसग्रहण)
माझ्या साम्राज्यात आता
मीच भूप मीच प्रजा
माझ्या देवळात झालो
मीच देव मी पूजा.
माझ्या मनात शलाका
विश्वगर्भ आकाशाची
माझ्या प्रज्ञेतुनि उदे
भागीरथी प्रकाशाची.
दूरतेला आली आता
माझ्यापाशी जवळीक
धरतीच्या मातीमधे
स्वर्गाशी हो सोयरीक.
नीतिरीतीची देहली
गेले ओलांडून मन
मुक्ततेत झाले सार्या
श्रृंखलांचे विसर्जन.
माझ्या आत्मतेस नाही
आता अहंतेचा पार
झाले अनंताचे घर
त्याला जीवनाचे दार.
कवी -कुसुमाग्रज
अर्थ –एकांतात रहाणारा,जगापासून निःसंग
फकीर
भाव –अध्यात्मिक, ईश्वराशी तादात्म्य साधणारा
शलाका–आत्मतेज आणि ईश्वर यांना साधणारी तेजोरेषा
भागिरथी –म्हणजे गंगा जी सर्वांचा देह मन शुद्ध करते
धरतीच्या मातीमध्ये स्वर्गाशी सोयरीक -म्हणजे– मनुष्याचा ईश्वराशी जोडणारा संबंध
श्रुंखला —कडी .नीतीपरंपरा,रितीरिवाज, नातीगोती मोहमायेची बेडी .
अनंताचे घर —ईश्वराचे घर .श्री विष्णू भगवान यांचे घर जे मनुष्याला मोक्ष देतात.
वरील सर्व उपमांनी नटलेली ,अध्यात्मिक मार्गावर नेणारी ,तालबद्ध,सुंदर लय साधणारी कवीवर्य कुसुमाग्रज यांची 'कलंदर ' कविता सारगर्भित रचना आहे.आत्मभान दर्शवते.मी आणि देव म्हणजेच आत्मा आणि परमात्मा यांच्यातील अद्वैत भाव दाखवणारी श्रेष्ठ
कविता आहे.कवी स्वतःला हरवून बसले आहेत. त्यांचे मन त्यांचे न रहाता एका वेगळ्याच जगात वावरत आहे.जिथे तेच राजा ,तेच प्रजा तेच देऊळ तेच देव आहे पूजा आहे.यावरून आशाताईंनी गायलेले गाणे आठवते
' मी मज हरपून बसले आता '.कवी सांगतात,
शरीर हेच त्यांचे राज्य त्यातील इंद्रिये मन बुद्धी ही त्यांची प्रजा आणि या शरीररूपी देवळात माझा आत्मा माझा देव आहे या सर्व इंद्रियांच्या साह्याने ज्ञानेंद्रियांच्या साह्याने मी त्या ईश्वराची पूजा करत आहे म्हणजे मीच देव आहे मीच पूजा आहे.माझ्या मनात आकाशातील विश्वगर्भ म्हणजे ईश्वराशी माझ्या आत्म्याला म्हणजे माझ्यातील देवाला जोडणारी एक तेजोरेषा आहे .आत्मभान जागृत करणारी एक प्रकाशमय ज्योत आहे ,ती माझी प्रज्ञा आहे म्हणजे बुद्धी .तिच्यातून निर्माण झालेली भागीरथी म्हणजे गंगा ती माझ्या भौतिक आवरणाला ,माझ्यातील षड्रिपूंना शुद्ध करत आहे.त्यामुळे मला दूस-या गंगेची आवश्यकता नाही. मला स्वतःला काय चांगले काय वाईट ही सारासार बुद्धी तर आलीच आहे पण त्यापेक्षाही मला माझ्या जीवनाचे गूढ कळले आहे.मला हा मनुष्यजन्म का मिळाला आहे याचा उद्देश काय आहे ह्याचे आत्मभान आले आहे.
आतापर्यंत दूर असलेला ईश्वर ,असाध्य वाटणारा माझ्या जवळ आला आहे ,मी ईश्वराच्या जवळ पोचायच्या मार्गावर आहे.मातीतून जन्म घेतलेला मी आकाशातील ईश्वराशी सोयरीक साधायच्या प्रयत्नात आहे .अत्यंत साधारण असा मी वाटेतील सर्व अडथळे दूर सारून अनंताकडे जाण्यासाठी प्रयत्नशील आहे .त्यासाठी नीतीअनीती,रुढीपरंपरा,नातीगोती, षड्रिपूंचे मायाजाल या सगळ्यांची श्रुंखला म्हणजे बेडी तोडून किंवा सगळ्या माझ्या प्रज्ञागंगेत विसर्जित करून मुक्त झालो आहे .आता माझ्यात अहंकाराचा लवलेशही उरला नाही.
आता मला फक्त एकच ध्यास आहे ईश्वराचा
त्याच्या घरी म्हणजे अनंताकडे जायचा.अनंत म्हणजे भगवान श्रीविष्णूंचे घर जे मनुष्याला मोक्ष प्रदान करतात.मला माहित आहे त्याच्याकडे जातांना सर्व पाशमुक्त, बंधमुक्त होऊनच जाता येते .हे केवळ मनुष्य
जन्मातच सहजशक्य आहे.परंतु त्यासाठी आपले ईश्वराशी असणारे नाते लक्षात घ्यावे लागते.या गोष्टीचे भान मला आले आहे .'मी कोण, कुठून आलो ,कुठे जायचे ,माझ्या जीवनाचा उद्देश काय' हे सर्व जाणून
घेतले पाहिजे .त्यालाच आत्मभान म्हणतात. असे आत्मभान लाभलेला मनुष्य सर्व जगापासून दूर एकटा आपल्याच विश्वात रमणारा फकीर असतो.त्याचे विश्व
म्हणजे फक्त तो आणि ईश्वर (आत्मा आणि परमात्मा).